निलंगा प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील बोटकुळ व परिसरात आज दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार असून, पिकांच्या वाढीस मोठी मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच विहिरी, शेततळी आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही या पावसाचा फायदा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. मात्र, आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाचा पावसाळा समाधानकारक व्हावा आणि शेतीला भरपूर पाणी मिळून चांगले उत्पादन घ्यायला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकरी आता पुढील पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
