
प्रतिनिधी :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका कायम असला तरी वातावरणात हळूहळू बदल होत असून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
येलो अलर्ट असलेल्या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, जळगाव, पुणे, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. तसेच कोकणातील काही भागांमध्येही तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील बहुतांश भागांत दिवसा उष्णता कायम राहण्याची शक्यता असली तरी सायंकाळनंतर वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
