
खटाव तालुका प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला टाळे लावण्यात आल्याने शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे. महिलांसाठी आवश्यक असलेली ही मूलभूत सुविधा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने महिला येत असतात. मात्र, स्वच्छतागृह बंद असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेच्या कारणास्तव स्वच्छतागृहाला टाळे लावण्यात आल्याची चर्चा असली, तरी नागरिकांनी हा उपाय योग्य नसल्याचे सांगितले आहे. स्वच्छता राखण्याबरोबरच सुविधा सुरू ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची तहसीलदारांकडून दखल घेऊन स्वच्छतागृह तातडीने सर्वांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
