शिर्डी प्रतिनिधी :
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी विभागाने खत विक्रीतील अनियमिततेविरोधात मोठी धडक कारवाई करत ४६ कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जून आणि जुलै महिन्यात ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही कृषी सेवा केंद्रांकडून खत विक्री करताना सक्तीचे लिंकिंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच ई-पॉस यंत्रणेवरील ऑनलाइन साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील खत साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली.
या अनियमितता आणि नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने २४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. तसेच कायमस्वरूपी बंद असलेल्या २१ केंद्रांसह श्रीरामपूरमधील आणखी एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण २२ केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, एकूण ४६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कोणतीही सक्ती न करता शासनाच्या नियमांनुसार खत विक्री करण्यात यावी, तसेच अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

