
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | ब्रम्हपुरी | प्रतिनिधी
ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत तालुक्यातील मूलभूत सुविधा १०० टक्के पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
नियोजन भवन येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य विभागातील लस व औषधांचा साठा, सार्वजनिक परिवहन व्यवस्था तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध मूलभूत सुविधांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री डॉ. उईके यांनी प्रत्येक विभागाने लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून अधिक प्रभावीपणे सेवा उपलब्ध करून द्याव्यात, प्रलंबित कामांना गती द्यावी आणि नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश दिले.
सन २०२६ च्या कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार शालेय वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला करण्यात आल्या. विशेष गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने शाळांच्या वेळेत आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाने दर्जेदार आरोग्य सेवा देत आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद करत, त्याच धर्तीवर तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आवश्यकतेनुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अथवा जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनीही विविध विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत सूचना मांडत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून सेवा वितरण अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
