
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | जळगाव | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन “संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना” अंतर्गत गावठाण म्हणून तातडीने उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुन्हा आवाज उठविला आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे विविध प्रशासकीय कामे रखडली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
गोर सेना आणि रामेश्वर तांडा येथील ग्रामस्थांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी व निवेदने सादर केली असून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित बनावट अर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, गट क्रमांक ६९/अ संदर्भात शासन आदेश, तहसीलदारांचे पत्र, ग्रामसभा ठराव आणि अन्य शासकीय पत्रव्यवहार झाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


