📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशातील मतदारयाद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेत आतापर्यंत ६० कोटी मतदारांची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.
राष्ट्रीय पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, मृत, स्थलांतरित, दुबार तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या मतदारांमुळे मतदारयाद्यांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’चा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया संविधानातील तरतुदींनुसार आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्लीसह विविध राज्यांतील सुमारे ३० कोटी मतदारांची एसआयआर प्रक्रिया सुरू असून, सप्टेंबरअखेरपर्यंत देशातील बहुतांश मतदारांची ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘एसआयआर’ पूर्ण झाल्यानंतर ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाल्याचा दावाही ज्ञानेश कुमार यांनी यावेळी केला.
स्थलांतरित मतदारांच्या नोंदणीबाबत निर्णय लवकरच
मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. अशा मतदारांची नोंदणी त्यांच्या मूळ मतदारसंघातच कायम ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
हा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.


