
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | करमाळा | प्रतिनिधी
उजनी जलाशयातून दररोज आठ तास वीज निर्मिती सुरू करण्याच्या मागणीसाठी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर इद्रिस दिलावर सय्यद, अविनाश मालती सरडे, योगराज दत्तात्रय सरडे, सचिन आनंदराव पांगरे, शंकर रामचंद्र बोंडे, दादासाहेब राजाराम सरडे, रजनीन भारत राठोड, दीपचंद पवन सरडे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी उजनी प्रकल्पासाठी आपल्या सुपीक जमिनी, घरे आणि इतर मालमत्ता शासनाला दिल्या. मात्र, त्याग करूनही आजही प्रकल्पग्रस्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या उजनी धरणात सुमारे ९५ टक्के म्हणजेच १२१ टीएमसी पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीतही वीज निर्मिती केवळ पाच तास सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी अपेक्षित वेगाने कमी होत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे वीज निर्मितीचा कालावधी वाढवून तो आठ तास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास करमाळा तालुक्यातील टोपेवाडी मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा, महावितरणचे अधिकारी, उजनी जलाशय विभाग तसेच महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

