
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | भिलवडी | वार्ताहर
मानवी जीवन भक्ती आणि प्रेमाशिवाय व्यर्थ आहे. शिक्षणामुळे साक्षर झालेल्या व्यक्तीला खरे शहाणपण प्राप्त होण्यासाठी ग्रंथांशी मैत्री करणे आवश्यक आहे. संतांनी निर्माण केलेली साहित्य संपदा ही आदर्श मानवी जीवनाचा वस्तुपाठ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक माधव जोशी यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कै. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘ग्रंथांच्या सांगाती’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेण्यात आले.
यावेळी माधव जोशी म्हणाले की, डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्श मार्गावर चालत सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
भिलवडी शिक्षण संस्थेला आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून एक लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल डॉ. रविंद्र वाळवेकर यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहसचिव के. डी. पाटील यांनी करून दिला. अश्विनी बंडगर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. महेश पाटील यांनी आभार मानले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले, डॉ. सुहास जोशी, संचालक महावीर वठारे, डॉ. रविंद्र वाळवेकर, संभाजी सूर्यवंशी, अजय चौगुले, मुकुंद जोग, प्रा. धनंजय पाटील, सदाशिव तावदर, जे. बी. चौगुले, भू. ना. मगदूम, सुनीता चितळे, अनघा चितळे, अशोक साठे, रोहित नलवडे, मुख्याध्यापक संजय मोरे, प्राचार्य सुरेश शिंदे, सुकुमार किणीकर, विद्या टोणपे, स्मिता माने, सुचेता कुलकर्णी, शंकर बल्लाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



