📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नवी दिल्ली | प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या मतदारयादींच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाने १० दिवसांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रीय पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत आतापर्यंत ७६.७२ टक्के मतदारांपर्यंत प्रगणना अर्ज पोहोचविण्यात आले असून, त्यापैकी ३५ टक्के अर्ज भरून मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वात कमी ८.३८ टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ८.४१ टक्के मतदारांनी अर्ज भरले आहेत. याउलट यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६७.५ टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्यात ६५.९८ टक्के मतदारांनी अर्ज सादर केले आहेत.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार घरोघरी भेटी देऊन अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ जुलै होती, तर अंतिम मतदारयादी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना अनेक ठिकाणी पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली होती.
राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविल्यानंतर आयोगाने १० दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे.
दरम्यान, पुनर्विकास आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या मतदारांना त्यांच्या मूळ ठिकाणीच मतदार म्हणून पात्र ठरविण्याचा प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.


