📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | चामोर्शी | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पावसासाठी चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धेला उजाळा देत अनोखा धार्मिक विधी पार पाडला.
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.) येथील ग्रामस्थांनी नदीवर जाऊन पवित्र पाणी आणले आणि ते गावातील मंदिरात नेऊन भगवानाचा जलाभिषेक केला. या विधीद्वारे चांगला पाऊस पडावा, शेती हिरवीगार व्हावी, पिकांचे नुकसान टळावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला यश मिळावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
गावात ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामस्थ श्रद्धेने हा विधी करतात. यावेळी महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सध्या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले असून, लवकरच दमदार पाऊस पडून खरीप हंगामाला दिलासा मिळेल, अशी आशा शेतकरी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



