📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | चांदवड | प्रतिनिधी
सिन्नर आगाराची संगमनेर-लासलगाव (फेरी क्र. १२१ व १२२) ही मुक्कामी बससेवा लासलगावऐवजी चांदवडपर्यंत वाढवून तिचा मुक्काम चांदवड येथे करण्यात यावा, अशी मागणी दिंडवडचे सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या ही बस संगमनेर, पांगरी, सोमठाणे, खेडले झुंगे, विंचूर मार्गे लासलगावपर्यंत धावते आणि तेथे मुक्कामी राहते. ही सेवा चांदवडपर्यंत वाढविल्यास परिसरातील नागरिक, नोकरदार आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी सायंकाळची येवला-लासलगाव-चांदवड बससेवा बंद झाल्यामुळे लासलगाव ते चांदवड दरम्यानच्या अनेक गावांतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच लासलगाव रेल्वे स्थानकावर सेवाग्राम एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांनाही या बससेवेचा लाभ होऊ शकतो.
याशिवाय, सकाळी साडेपाच वाजता बस चांदवडवरून सुटल्यास पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. या बससेवेचा लाभ निमगाववहाण, हिवरखेडे, दिंडवड, दहीवड, कोलटेक, पाटे, दरसवाडी, वाळकेवाडी, पिंपळस यांसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना होणार असल्याने बसचा मुक्काम चांदवड येथे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
