
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मानवत | प्रतिनिधी :
मानवत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रत्नापूर टोल नाक्यावर शनिवार, १८ जुलैपासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा गाजावाजा न करता टोल वसुली सुरू झाल्याने वाहनचालकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रत्नापूर येथील टोल नाक्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे हा टोल नाका सुरू होणार नसल्याची भावना नागरिक आणि वाहनचालकांमध्ये होती. मात्र, अचानक टोल वसुली सुरू झाल्याने वाहनधारकांना नव्या व्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे.
टोल वसुलीच्या पहिल्याच दिवशी अनेक वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये दर व नियमांबाबत वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली.
दरम्यान, रत्नापूर टोल नाका सुरू झाल्याने परभणी-पाथरी मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून, टोल वसुलीबाबत प्रशासनाने आवश्यक जनजागृती व स्पष्ट सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
