
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | फलटण | प्रतिनिधी :
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा गुरुवारी तारडगाव नगरीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दाखल झाला. विठुरायाच्या भेटीच्या निम्म्या वाटेवर पोहोचलेल्या वारकऱ्यांचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “माऊली… माऊली…”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
तारडगावमध्ये आगमनानंतर विठ्ठल मंदिर, पवारवाडा, श्रीराम मंदिर, चाफळकर, सावता महाराज मंदिर तसेच बापूबुवा समाधी मठ येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मानाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मानाचा हार, श्रीफळ, फेटा, शाल, मिठाई व फळे अर्पण करून माऊलींना अभिवादन करण्यात आले.
पालखी सोहळ्यानिमित्त नवश्या गणपती तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली. या सेवाकार्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत विमान अपघातात शहीद झालेले विदीप जाधव यांच्या कार्याची आठवण उपस्थितांनी काढली.
हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या लयबद्ध डोलण्यात तारडगाव नगरी दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघाली. गावातील प्रत्येक रस्ता, चौक आणि गल्ली वारकऱ्यांच्या उत्साहाने आणि भक्तीभावाने फुलून गेली होती.

पालखीचा तारडगाव येथील मुक्काम पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होणार आहे.
