
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | आंबेगाव वसाहत | प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण विकास मंडळ (पुणे) संचालित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, आंबेगाव वसाहत येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक ‘दिंडी सोहळा’ भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व पालखी पूजनाने झाली. त्यानंतर ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल नामाचा’ जयघोष करत गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
या सोहळ्यात विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीगीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. मिरवणुकीनंतर विठ्ठलाची आरती करून उपस्थित लहान वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक ए. के. लोहकरे यांनी केले. मुख्याध्यापक पी. डी. चव्हाण यांनी आषाढी एकादशी व दिंडी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सौ. व्ही. जी. काळे, आर. बी. राजगुरु, ए. के. लोहकरे, आर. बी. राक्षे, सौ. एल. पी. वाघ, व्ही. एच. गायकवाड, सौ. जी. एस. विसावे आणि सौ. आर. एस. बटवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
