लोणी | प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील पूर्व व उत्तर भागातील पारगाव, काठापूर, लोणी, जारकरवाडी, निरगुडसर आदी गावांमध्ये सायंकाळी सुरू असलेल्या रात्रीच्या भारनियमनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत होणारे भारनियमन तातडीने बंद करून, वीज कपात करावयाची असल्यास ती दिवसा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पारगावचे माजी उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे तसेच परिसरातील नागरिकांनी ही मागणी करत महावितरणने दुर्लक्ष केल्यास संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि व्यावसायिकांना बसत आहे. सायंकाळच्या वेळेत दूध काढणे, जनावरांसाठी कुट्टी मशीनद्वारे चारा तयार करणे, शेतीची कामे आणि घरगुती कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. याच काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची महत्त्वाची वेळ सायंकाळची असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत असल्याचे पालकांनी नमूद केले आहे. तसेच परिसरात बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने अंधारात नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगण्यात आले.
“महावितरणने ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन रात्रीऐवजी दिवसा भारनियमन करावे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे माजी उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे यांनी सांगितले.
दरम्यान, या मागणीवर महावितरण प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


