
उरण | प्रतिनिधी :
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे आणि आरोग्य सुविधांच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन, धरणे आणि उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, द्रोणागिरी नोडचा विकास करताना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांनंतरही मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक दिवसाआड होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होत असताना इतर भागांतील नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
याशिवाय, परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठे खड्डे, उखडलेले रस्ते आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. याचा परिणाम नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गटारे आणि नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उघड्या गटारांमुळे डासांची संख्या वाढून डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार असल्याचे नमूद करत, आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
नागरिकांनी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा, सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, गटारे व नाल्यांची स्वच्छता, बंद गटार व्यवस्था आणि आरोग्यविषयक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याची मागणी केली आहे.
समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलन, धरणे आणि उपोषण छेडण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सिडको प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.


