तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु. गावात खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला असतानाच मजुरांच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्याने खुरपणी, फवारणी यांसारखी महत्त्वाची शेतीकामे रखडली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी या काळात शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने शेतीकामे करतात. मात्र, यंदा पिवंदळ बु. व परिसरात मजुरांची भीषण कमतरता जाणवत आहे. मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, वाढीव मजुरी देण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या अनेक शेतकऱ्यांना ऊखळी बाजार येथील मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. गावातील तरुण वर्ग रोजगारासाठी शहरांकडे वळल्याने स्थानिक मजुरांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, काही मोठ्या शेतकऱ्यांना इतर तालुके किंवा परराज्यातून मजूर आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागत असून, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
शेतीचे यांत्रिकीकरण वाढले असले तरी अनेक कामांसाठी मानवी श्रम आवश्यक असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. प्रशासनाने स्थानिक पातळीवर रोजगार हमी योजना आणि इतर उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिवंदळ बु. परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.


