
जत | प्रतिनिधी :
जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडली असून, अक्काताई उमाजी गळवे (वय ६५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्काताई गळवे यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.
अक्काताई गळवे या गावातील प्रेमळ आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी शेतात, झुडपांमध्ये किंवा ओलसर ठिकाणी काम करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.




