
सावली | प्रतिनिधी
सावली, सास्ताबाद आणि तरोडा या गावांना एकाच वीज फिडरवरून वीजपुरवठा होत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावली व तरोडा फिडर स्वतंत्र करण्यात यावेत, अशी मागणी सावलीचे माजी उपसरपंच भूषण झाडे यांनी आमदार राजेश बकाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावली गावाची लोकसंख्या सुमारे १,५३९ असून गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या सावली, सास्ताबाद आणि तरोडा ही तिन्ही गावे एकाच फिडरवर असल्याने तरोडा येथे वीज बिघाड झाल्यास दोष शोधण्यासाठी बराच वेळ लागतो. या काळात संपूर्ण फिडर बंद ठेवावा लागत असल्याने सावली व सास्ताबाद गावांनाही वीजपुरवठा खंडित होतो.
यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने सावली व तरोडा यांचे स्वतंत्र फिडर करून नियमित व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी सरपंच विनोद तिमांडे, माजी उपसरपंच सुधीर वाघमारे, प्रशांत वैद्य, सुरज गुळघाने, प्रवीण चांभारे, निनाद बोरकर, सचिन बोरकर, भूषण सिद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





