
सांगली | प्रतिनिधी
श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळ्याच्या आषाढी वारीत किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर या पायी दिंडीसोबत जिल्हा परिषद सांगलीच्या आरोग्य सेवेत कार्यरत आरोग्यदूत वारकऱ्यांची अखंड आणि अविरत सेवा बजावत आहेत. दिनांक १४ जुलै २०२६ पासून हे आरोग्यदूत पालखी सोहळ्यासोबत राहून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याला शारीरिक त्रास जाणवला, तब्येत बिघडली किंवा तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक झाली, तर हे आरोग्यदूत तत्काळ मदतीसाठी धावून जातात. त्यामुळे वारकऱ्यांच्या दृष्टीने हे आरोग्यसेवक जणू साक्षात पांडुरंगाच्या रूपाने मदतीला धावून येतात, अशी भावना अनेक वारकरी व्यक्त करत आहेत.
या सेवेमुळे वारकऱ्यांना वारीदरम्यान मोठा दिलासा मिळत असून, आरोग्यदूतही अत्यंत आनंदाने वारकऱ्यांमध्ये मिसळून सेवा बजावत आहेत. टाळ-मृदंगाच्या नादात, फुगडी, गोल रिंगण आणि भक्तिमय वातावरणात सहभागी होत असतानाही ते आपल्या आरोग्य सेवेची जबाबदारी तितक्याच तत्परतेने पार पाडत आहेत.
“आरोग्याची वारी पांडुरंगाच्या दारी” या भावनेतून हे आरोग्यदूत वारकऱ्यांची निरंतर सेवा करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेला वारकरी भाविकांकडून मानाचा मुजरा करण्यात येत असून, या सेवेमुळे आषाढी वारी अधिक सुरक्षित आणि सुखकर होत आहे.





