उदगीर | प्रतिनिधी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय, चिंचोली (लातूर) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मालेगाव येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA – Participatory Rural Appraisal) या उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना आणि अनुभव मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर धुमणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एम. आर. मुळे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा. एम. आर. मुळे यांनी सांगितले की, पीआरए तंत्रज्ञानामुळे कृषी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, समस्या आणि गरजा समजून घेण्याची संधी मिळते. या अभ्यासातून ग्रामीण व कृषी विकासासाठी अधिक प्रभावी आणि व्यावहारिक नियोजन करता येते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पीआरएच्या विविध शास्त्रीय पद्धतींचा वापर करून मालेगावचा सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, कृषी व्यवस्था, नैसर्गिक संसाधनांची सद्यस्थिती तसेच विकासाच्या संधींचे सविस्तर सादरीकरण केले. लोकसहभागाशिवाय ग्रामीण विकास शक्य नसल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दिला.
या उपक्रमात कृषीदूत वैभव जाधव (प्रास्ताविक), ऋतिक राठोड, गोविंद धुमणे, शिवम कदम, हृतिक अवचेल आणि गणेश वांढे यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हा कार्यक्रम रावे समन्वयक प्रा. बी. डी. कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. राकेश कुमार माशेट्टी आणि हृतिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
समारोप प्रसंगी उपस्थित शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळण्याबरोबरच ग्रामीण भागात कृषीविषयक जनजागृती आणि विकासाला चालना मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




