कवठे महांकाळ | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जाखापूर येथील कै. रामराव दादा बोराडे विचारमंच यांच्या वतीने “एक दिवस वारकऱ्यांसाठी” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
मिरज ते पंढरपूर या प्रमुख वारी मार्गावरून प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना उन्हाचा त्रास कमी व्हावा तसेच उपवासासाठी आवश्यक अल्पोपहार मिळावा, या उद्देशाने विचारमंचाच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, उपवासाचे वेफर्स, भडंग, लाडू आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विचारमंचाच्या अध्यक्षांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम यंदा प्रथमच राबविण्यात आला असून, भविष्यातही तो दरवर्षी नियमितपणे सुरू ठेवण्याचा मानस आहे.
वारीतील दिंड्यांमधील वारकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल विचारमंचाचे आभार मानत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारी मार्गावरून जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना दिलासा मिळाला असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.




