छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातील रुग्णांनी समाजसेवेचा आदर्श घालून देत वारकऱ्यांसाठी तब्बल १ हजार गुळ-शेंगदाणा लाडू तयार केले. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकेकाळी व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या आणि आज नवजीवनाची वाटचाल करणाऱ्या रुग्णांनी दिवसभर श्रमदान करून लाडू तयार केले. “सेवा हीच खरी साधना” या भावनेतून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपले योगदान दिले.
या उपक्रमाचे आयोजन मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. सुनील नागरगोजे आणि सुमन नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुनर्वसन प्रक्रियेला सकारात्मक दिशा देण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
डॉ. नागरगोजे यांनी सांगितले की, व्यसनमुक्ती म्हणजे केवळ व्यसन सोडणे नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडविणे होय. अशा उपक्रमांमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजाशी त्यांचे नाते अधिक दृढ होते.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेले हे गुळ-शेंगदाणा लाडू केवळ अल्पोपहार नसून, व्यसनमुक्तीनंतर नवजीवन स्वीकारलेल्या अनेकांच्या सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.:::


