छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
देशातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक धोरणांबाबत नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजीनगरातील विद्यार्थ्यांनी रविवारी क्रांती चौक येथे जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी विविध विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होत शिक्षण क्षेत्रातील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नैतिक समर्थन देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, निकालातील विलंब आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी “शिक्षण हक्क आहे, उपकार नाही”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “बेजबाबदार शिक्षणव्यवस्था बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण, वाढती शैक्षणिक असमानता, स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवरही चिंता व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
क्रांती चौकातील या आंदोलनात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व्यापक पातळीवर चर्चा होऊन शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

