सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानात पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच बोगस मतदारांची नावे असल्यास ती शासकीय बीएलओंच्या निदर्शनास आणून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे आणि पावशी या जिल्हा परिषद विभागांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत संघटनात्मक आढावा घेत मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वैभव नाईक यांनी बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी आपल्या बूथवरील प्रत्येक मतदाराची नोंदणी झाली आहे का, याची खात्री करावी तसेच शासकीय बीएलओंसोबत समन्वय साधून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे, असे सांगितले. पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत आणि बोगस नावे मतदार यादीत राहणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत बोलताना वैभव नाईक यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. वाढती महागाई, स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, वीजपुरवठ्याचे प्रश्न, स्मार्ट वीजमीटर, अणुऊर्जा आणि मायनिंग प्रकल्प, तसेच विविध योजनांतील लाभार्थ्यांच्या अडचणींसह कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांनी आपल्या आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी या प्रश्नांवर आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्यासह पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे आणि पावशी विभागातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


