कन्नड | प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील पिशोर–कोळंबी–भारंबा तांडा या प्रमुख मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.
पिशोर बाजारपेठेशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक आणि वाहनांची या रस्त्यावरून ये-जा असते. मात्र, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला असून “खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पिशोर येथील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी त्याचा अप्रोच रस्ता (जोड रस्ता) अद्याप अपूर्ण असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र जारवाल यांनी लवकरच रस्त्याच्या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात येणार असून उर्वरित काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पिशोर–कोळंबी–भारंबा तांडा मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
