
पाथरी | प्रतिनिधी :
पाथरी तालुक्यात सुरू असलेले अन्यायकारक वीज लोडशेडिंग १ ऑगस्ट २०२६ पूर्वी बंद करून नियमित व सुनियोजित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, परभणी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे आणि पाथरी तालुकाप्रमुख हरिभाऊ वाकणकर यांनी २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, वाघाळा, बाभळगाव, रेणापूर, विटा, हदगाव तसेच पाथरी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये आणि शेती परिसरात दररोज अवेळी वीज लोडशेडिंग होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळीच त्रिफेज वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकरी आणि नागरिक दोघांनाही त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्यामुळे साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका वाढत असून, अनेक ठिकाणी रॉकेलही उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे तालुक्यातील लोडशेडिंग तातडीने बंद करून नियमित व नियोजनबद्ध वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेना (उबाठा)च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, तालुकाप्रमुख हरिभाऊ वाकणकर तसेच लोणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गवारे यांनी दिला आहे.
या निवेदनानंतर प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
