
पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर डॉ. अभिजित सपकाळ यांची १७ वर्षांची अखंड आरोग्यवारी; हजारो वारकऱ्यांना उपचारांचा आधार
भोकरदन | प्रतिनिधी
टाळ-मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठलाचे नाम आणि पंढरीच्या दिशेने निघालेला लाखो वारकऱ्यांचा जनसागर… या भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या तब्बल १७ वर्षांपासून डॉ. अभिजित सपकाळ आणि त्यांचे वैद्यकीय पथक निःस्वार्थपणे सेवा बजावत आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून त्यांनी पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर अखंड आरोग्यसेवेची परंपरा जपली आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता पायी प्रवास करतात. या प्रवासात उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी रेड स्वस्तिक सोसायटीच्या सहकार्याने डॉ. अभिजित सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यंदाही १९ दिवस मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वैद्यकीय पथकाकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, प्रथमोपचार, औषधोपचार, वैद्यकीय सल्ला तसेच गरजेनुसार आपत्कालीन उपचारांची सुविधा दिली जात आहे.
१० लाख रुपयांच्या औषधांचे मोफत वितरण
यंदाच्या सेवाकार्यात सुमारे १० लाख रुपये किमतीच्या औषधांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात असून ताप, सर्दी, अंगदुखी, थकवा, पायांचे विकार आदी समस्यांवर तातडीने उपचार केले जात आहेत.
१७ वर्षांची अखंड सेवा
डॉ. अभिजित सपकाळ यांनी गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने ही सेवा सुरू ठेवली आहे. हजारो वारकऱ्यांना वेळेवर उपचार मिळवून देत त्यांच्या भक्तीच्या प्रवासाला आरोग्याची साथ देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. डॉक्टरकी हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
या सेवाकार्यात डॉ. विवेक अधिकार, गणेश कुलकर्णी, डॉ. मंगेश सपकाळ, विजय पवार यांच्यासह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांची टीम सहभागी झाली आहे.
“प्रत्येक वारकरी सुखरूप पंढरीत पोहोचावा”
याबाबत बोलताना डॉ. अभिजित सपकाळ म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच आमच्यासाठी विठ्ठलाची सेवा आहे. गेली १७ वर्षे आम्ही निःस्वार्थ भावनेने ही आरोग्यसेवा देत आहोत. प्रत्येक वारकरी सुखरूप पंढरीत पोहोचावा, हाच आमचा प्रयत्न असून समाजाच्या सहकार्याने ही सेवा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.”
भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमामुळे पालखी मार्गावरील हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून, डॉ. अभिजित सपकाळ आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या सेवाभावाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

