
अंबड | प्रतिनिधी
अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, खरीप हंगामातील सुमारे 80 टक्के पेरणी केलेली कोवळी पिके कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेळेवर पेरणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने आणि त्यातच कडक ऊन व वाऱ्याचा तडाखा बसल्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक ठिकाणी उगवलेली पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाची नितांत गरज असून, लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी विभागाने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
