सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या वतीने शहादा येथे सोमवारी (दि. 20) लाक्षणिक उपोषण व निदर्शने करण्यात आली.
शहादा शहरातील प्रांताधिकारी कार्यालय परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलकांनी शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या अभावाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण मानसिक तणावाखाली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाची पावले उचलल्याच्या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच वाढती बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमता यांसारख्या प्रश्नांवरही सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
- दिल्लीतील आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारने तातडीने चर्चा करावी.
- शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
- राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती प्रक्रियेची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी.
- पेपरफुटी व भरती गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई करावी.
- बंद पडलेल्या शासकीय शाळा पुन्हा सुरू करून शिक्षण क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणूक वाढवावी.
- परीक्षा व्यवस्थेसाठी पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे.
- शिक्षणातील खासगीकरण व व्यापारीकरणावर प्रभावी नियंत्रण आणावे.
- संविधानिक मूल्ये, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार शिक्षण व रोजगार धोरणांची पुनर्रचना करावी.
“शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून तो भ्रष्टाचाराचा विषय होऊ शकत नाही. तरुणांचे भविष्य सुरक्षित करणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात वाहरू सोनवणे, नामदेव पटले, अनिल कुवर, कॉ. ईश्वर पाटील, सुरेश मोरे, निलेश पाटील, डॉ. तुषार सन्नानसे, चंद्रसिंग बरडे, गोसा पेंटर, वनसिंग ठाकरे, जमन ठाकरे, हरीष बोरसे, योगेश मोगरे, अजय ठाकरे, रंजना कान्हेरे, ज्योती नाईक, भामिनी पिंपळे, प्रा. नेत्रदीपक कुवर, हिरालाल रोकडे, योगेश सावंत, रूपेश जाधव, वनिता पटले, ताराताई मराठे, राजेंद्र गावित, प्रा. मनोज गायकवाड, ॲड. महिरे, ॲड. खर्डे, पी. एस. पेंढारकर, दिलवर पाडवी, राजेश ठाकरे, तात्याजी पवार, धनराज पानपाटील, संजू पानपाटील, सचिन पानपाटील, इंजि. रविंद्र आगळे, विनायक सावळे, हृदयेश चव्हाण, रमेश बिरारे, दिलीप बिरारे, प्रदीप केदारे, भुजबळ गुरुजी, जितेंद्र बिरारे, विश्वास जगदेव, संजना सोलंकी, मंदाकिनी रामराजे, दादाभाई पिंपळे, सुनील शिरसाठ, चुनिलाल ब्राम्हणे, गणेश वळवी यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
