
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील चिंचोली (बोटोनी सर्कल) अंतर्गत ग्राम जळका येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब समोर आल्यानंतर वणी विधानसभा मतदारसंघातील मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत मारेगाव पंचायत समितीत धाव घेतली.
ग्राम जळका येथील जिल्हा परिषद शाळेत सुमारे ६० ते ६५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेत केवळ एक शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी राजूभाऊ उंबरकर यांच्याकडे केली होती.
यानंतर राजूभाऊ उंबरकर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वाहनखंडे यांना निवेदन देऊन शाळेत तातडीने अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत गरज भासल्यास स्वखर्चातून शिक्षकांचे वेतन देण्याचीही तयारी राजूभाऊ उंबरकर यांनी दर्शविल्याची माहिती समोर आली.
या वेळी मनसेचे संतोषभाऊ रोगे, चांद बहादे, खामणकर, अनंतभाऊ, सचिनभाऊ यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच ग्राम जळका येथील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
गटविकास अधिकारी भीमराव वाहनखंडे यांनी या मागणीची दखल घेत शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम जळका येथील पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
