सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नाशिक | प्रतिनिधी
नाशिक, दि. २१ : दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे जलसंपदा विभागाने आज (दि. २१ जुलै) सायंकाळी ७.०० वाजता पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणातील पाण्याची आवक वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते.
यामुळे कादवा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीलगत जाणे टाळावे. तसेच पशुधन, शेतीमाल, मोटारपंप आणि इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही माहिती पालखेड पाटबंधारे उपविभाग, पिंपळगाव (ब.) येथील सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्ध केली आहे.
