
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | | प्रतिनिधी
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (IAS, निवृत्त) यांनी श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ऐतिहासिक गुरमत समागमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत डॉ. विजय सतबीर सिंघ आणि सरदार जसवंत सिंघ बॉबी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शीख समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा सिरोपाव आणि प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नागपूर, नवी मुंबई आणि तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर गुरमत समागमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाअंतर्गत श्री हजूर साहिब येथे आयोजित दोन दिवसीय महान कीर्तन दरबारात देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी झाले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नेहमीच गुरु घर आणि शीख संगतप्रती आदराची भावना जपली आहे. लाखो भाविकांसाठी लंगर, निवास, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षेची उत्कृष्ट व्यवस्था प्रशासनाने केली. या यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आणि वैयक्तिक लक्ष महत्त्वाचे ठरले. या समागमात सहभागी झालेल्या सर्व संत-महापुरुषांचेही त्यांनी आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तख्त साहिबच्या प्रशासकांचे आभार मानत, भविष्यातही शीख समाजाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
