
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ‘शिव-शाहू, फुले-आंबेडकर विचार मंच’ यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, देशभरातील विद्यार्थी शिक्षणातील वाढत्या समस्या, भरती प्रक्रियेतील विलंब आणि विविध शैक्षणिक धोरणांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करत होते. मात्र, आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना लोकशाही आणि संविधानिक मूल्यांना धक्का देणारी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
रत्नागिरीतील निषेध मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पडणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षणाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे सांगत जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, पालक, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अभिजित हेगशेट्ये यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
