
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पारनेर | प्रतिनिधी
पारनेर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक प्रतिष्ठान, पारनेरच्या वतीने मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेऊन अनुसूचित जातींच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारकडे सकारात्मक भूमिका घेऊन पत्रव्यवहार करण्याची विनंती केली.
यावेळी शिष्टमंडळाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानातील तत्त्वांनुसार न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. शैक्षणिक मागासलेपणा, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाचे न्याय्य वाटप लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने अण्णासाहेब हजारे यांच्याकडे केली.
यावर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी निवेदन शांतपणे ऐकून घेत विषयाचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाकडे योग्य तो पत्रव्यवहार करण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले.
यावेळी संतोष शेलार, सतीश साळवे, राजेंद्र आल्हाट, विशाल साळवे, रामदास साळवे, आदिनाथ उमाप, रवींद्र साळवे, मारुती उमाप, संजय शेलार, स्वप्निल जाधव, संजय पठारे, सूर्यभान वैराळ, भानुदास साळवे, प्रमोद आरणे, राजू वैराळ, रामदास वायदंडे आणि मनोहर कानिंगध्वज आदी उपस्थित होते.
