सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नागूर | प्रतिनिधी
नागूर : लोहारा शहरासह कास्ती (खुर्द/बुद्रुक), नागूर, कानेगाव, भातागळी आणि आरणी येथील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेली लोहारा–लातूर बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
या परिसरातील नागरिकांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि इतर कामांसाठी लातूर शहराशी सातत्याने संपर्क असतो. मात्र बससेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, वेळेवर वाहने उपलब्ध न झाल्याने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार, औसा आगारातून सायंकाळी ६ वाजता लातूरहून लोहारा येथे मुक्कामी बस सोडण्यात यावी. तसेच सकाळी ६ वाजता लोहारा–कास्ती–नागूर–कानेगाव–आरणी–उजनी–औसा–लातूर या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी.
ही बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे आगार प्रमुखांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घेत लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागूर ग्रामस्थांसह कास्ती, कानेगाव, भातागळी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
