
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शिरूर | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे यंदाच्या पावसाळ्यात वेळेत झालेल्या पावसामुळे बाजरी पिकाची उगवण अत्यंत समाधानकारक झाली आहे. वेळेवर झालेली पेरणी, योग्य बीजप्रक्रिया आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेली लागवड यामुळे जवळपास ९० टक्के उगवण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा बाजरीचे बंपर उत्पादन होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी पूर्ण केली. त्यानंतर सातत्याने झालेला पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे पिकांची वाढ जोमदार होत असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गावातील शेतकरी बाबाजी पडवळ आणि राहुल पडवळ यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत इतकी चांगली बाजरीची उगवण पाहायला मिळाली नव्हती. हवामानाने अशीच साथ दिल्यास प्रति एकर उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन प्रति क्विंटल सरासरी दोन ते तीन क्विंटल अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
यावेळी गावातील ज्येष्ठ शेतकरी जनार्दन भोरडे, योगेश यवले, संदेश भोरडे, मारुती दंडवते, साळभाऊ पानगे आणि नवनाथ हाजारे यांनीही यंदाची उगवण समाधानकारक असल्याचे सांगत, पुढील काळात पावसाचे प्रमाण संतुलित राहिल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

