
ऊसतोड कामगारांच्या मुलीवर पहाटे गोठ्यात झोपेत असताना हल्ला; वन विभागाची युद्धपातळीवर शोधमोहीम
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शिरूर | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात बुधवारी (दि. २२ जुलै) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाग्यश्री संदीप वारे असे मृत मुलीचे नाव असून ती ऊसतोड कामगार दाम्पत्याची मुलगी होती. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही आई-वडिलांसोबत घराशेजारील गोठ्यात झोपली होती. पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक राजहंस मॅडम तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शासनाच्या नियमानुसार मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घटनेनंतर वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातूनही पाहणी सुरू आहे. रात्रगस्त वाढविण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. वन विभागाचा हेल्पलाईन क्रमांक : १८०० ३०३३.
दरम्यान, या घटनेनंतर पिंपळसुटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

