सारथी महाराष्ट्राचा न्यूज | दोडामार्ग | प्रतिनिधी
‘मागेल त्याला काजू कलमे‘ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेळेत काजू कलमे न मिळाल्याच्या निषेधार्थ गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी दोडामार्ग कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते संदेश वाघो वरक आणि पीडित शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत काजू कलमे वेळेत उपलब्ध होणे आवश्यक होते, जेणेकरून पावसाळ्यात लागवड नियोजनबद्ध पद्धतीने करता आली असती. मात्र २२ जुलै २०२६ पर्यंतही अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना काजू कलमे मिळाली नसल्याने लागवडीचे नियोजन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कृषी विभागाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.

