
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | परभणी | प्रतिनिधी
शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या आणि साहित्याच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी आता ‘देशी जुगाड’चा अवलंब केला आहे. खत पेरणी करताना कपडे खराब होऊ नयेत तसेच काम अधिक सोयीचे व्हावे यासाठी शेतकरी रिकाम्या खताच्या पिशव्यांपासून खतपेरणीची ओटी (संरक्षक एप्रन) तयार करत आहेत. शेतकऱ्यांच्या या कल्पकतेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
शेतात खत टाकताना अंगावर खताचे डाग पडून कपडे खराब होतात. तसेच खत वाहून नेण्यासही अडचणी येतात. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी रिकाम्या खताच्या पिशव्या कापून त्यापासून ओटीसारखे संरक्षक वस्त्र तयार केले आहे. यामुळे कपडे खराब होत नाहीत, पावसाळ्यात ओलेही होत नाहीत आणि खत पेरणीचे काम अधिक सोयीस्कर होते.
बाजारातून महागडे एप्रन खरेदी करण्याऐवजी सहज उपलब्ध असलेल्या खताच्या रिकाम्या पिशव्यांचा पुनर्वापर करून हा देशी जुगाड तयार केला जात आहे. त्यामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच प्लास्टिक कचरा कमी करण्यासही मदत होत आहे.
एका शेतकऱ्याने सांगितले, “महागाईच्या काळात प्रत्येक पैसा वाचवावा लागतो. कंपनीचे एप्रन घेण्यापेक्षा हाताशी असलेल्या खताच्या पिशवीचा उपयोग केला. त्यामुळे कामही सोपे झाले आणि पैशांचीही बचत झाली.”
‘वेस्टमधून बेस्ट’ या संकल्पनेचे हे उत्तम उदाहरण असून, Recycle आणि Reuseचा प्रभावी वापर यातून दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, अशा छोट्या-छोट्या नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

