
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | परभणी | प्रतिनिधी
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्यातही बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, याबाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अॅड. दिगंबर घुगे आणि युवा तालुकाध्यक्ष शरद कांबळे यांनी सांगितले की, दिल्ली येथे संवैधानिक हक्कांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई निषेधार्ह आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, विविध आघाड्या, शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच्या संघटना तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. दिगंबर घुगे आणि शरद कांबळे यांनी केले.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर श्रीरंग पंडित, मंदाकिनीताई राठोड, बापूराव धवडगे, जालिंदर वाघमारे, अमोल सूर्यवंशी, भगवान सरवदे, कैलास काळे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

