श्रीरामपूर | प्रतिनिधी
तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) निखिल गुप्ता यांनी श्रीरामपूर येथे भेट देऊन स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सुमारे दोन तास उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था, संघटित गुन्हेगारी, अवैध व्यवसाय तसेच गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर उपस्थित होते.
आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता, तसेच सलग चार दिवस शहर बंद पाळण्यात आला. गुन्हेगारीविरोधात विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची श्रीरामपूर भेट आणि उच्चस्तरीय आढावा बैठक ही शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

