श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर तालुक्यात सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांमुळे करपू लागली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
महागडे बियाणे, खते आणि मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकरी स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत असले, तरी विहिरी आणि बोअरवेलही कोरड्या पडू लागल्याने त्यांच्यासमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
तालुका कृषी विभागाने यंदा ३६ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र आतापर्यंत केवळ २२ हजार ५१२ हेक्टर (सुमारे ७५ टक्के) क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित खरीप हंगामावर अवलंबून असते. यंदा जूनपासूनच पावसाने अनियमित हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर कशीबशी पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतरच्या दीर्घ खंडामुळे उगवून आलेली पिके कोमेजू लागली आहेत.
काही ठिकाणी कोळपणी व खुरपणीची कामे सुरू असली तरी तालुक्यातील बहुतांश शिवार अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

