
नांदगाव खंडेश्वर | प्रतिनिधी
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेची मागणी तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ व दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ भर पावसात शेकडो युवकांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर लाँग मार्च काढला.
नगराध्यक्ष सौ. प्राप्ती मारोटकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे प्रकाश मारोटकर, काँग्रेसचे अमोल धवसे आणि एसएफआयचे राजगुरू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले. मोर्चानंतर तरुण युवक कृती समितीच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
स्थानिक विश्रामगृहापासून सुरू झालेल्या मोर्चात सहभागी युवकांनी हातात तिरंगा तसेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन शांततेत मार्च काढला. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदार देशपांडे यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले.
यावेळी विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो युवक उपस्थित होते.
यावेळी प्रकाश मारोटकर यांनी सांगितले की, पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असून, वर्षानुवर्षे परिश्रम करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.

