
बैलजोड्या कमी झाल्या, ट्रॅक्टरने घेतली बैलाची जागा; मात्र कृतज्ञतेचा पोळा आजही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग
लेखक : प्रा. डॉ. रवी दलाल, काटोल (नागपूर)
संकलन : अविनाश गोंडाणे, अमरावती
ग्रामीण भागातील बैलपोळा आता हळूहळू बदलत्या काळाच्या वाटेवर आहे. खेड्यापाड्यांत बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. शेतीच्या कामात ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढल्याने बैलांचे पारंपरिक महत्त्व काही प्रमाणात कमी झाले असले, तरी शेतकऱ्याच्या जीवनात बैलाबद्दलची कृतज्ञता आणि जिव्हाळा आजही कायम आहे. पोळ्याच्या निमित्ताने या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एका समृद्ध ग्रामीण संस्कृतीचे स्मरण करण्यासारखे आहे.
बैलपोळा हा ग्रामीण भागातील शेतकरी माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. पोळ्याच्या आदल्या दिवसापासूनच बैलांचे शेतीचे काम बंद केले जायचे. त्यांना हिरवा चारा खाऊ घालण्यासाठी शिवारात नेले जाई. काही दिवस आधीपासूनच ढेप, सरकी, कडबा, कुटार आणि गव्हाचा उंडा यांसारखा पौष्टिक आहार दिला जाई. पोळ्याच्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जायची.
दुसऱ्या दिवशी बैलजोडीला नदीवर किंवा विहिरीवर नेऊन मनसोक्त अंघोळ घातली जायची. त्यानंतर हळद आणि तुपाने बैलांच्या खांद्यांची मळणी केली जाई. घरातील सुवासिनी बैलांची पूजा करून औक्षण करत. पळसाच्या फांद्या आणि बेगडांनी घराचा दरवाजा सजविला जाई.
यानंतरची एक विशेष परंपरा म्हणजे बैलांना आवतन देण्याची. घरचा धनी दोन्ही हातांचा पोगा करून मोठ्याने बैलांना दुसऱ्या दिवशी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण देत असे. हा आवाज गावाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत असे. वर्षभर शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट करणाऱ्या बैलाला त्या दिवशी गोडधोड खाऊ घालून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जायची.
पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी आणि सजावट हा विशेष आकर्षणाचा भाग असतो. शिंगांना रंगीत बेगड, गळ्यात घुंगरमाळा, पाठीवर रंगीबेरंगी झूल, मोरपिसांचे तुरे, आरसे आणि विविध अलंकारांनी बैलजोडी सजविली जायची. नव्या वेसणी, गळपट्टे, घुंगरू आणि मुसके बांधून बैलजोडीला तोरणाखाली नेण्यासाठी सज्ज केले जाई. वर्षभर बैलांची सेवा करणाऱ्या गडी-माणसालाही घरमालकाकडून नवीन कपडे देण्याची परंपरा होती.
गावातील सर्व बैलजोड्या ठरलेल्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर मानाच्या बैलजोडीच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाई. मानाची बैलजोडी आल्यानंतर गोठाणाची पूजा होऊन बैलपोळ्याला सुरुवात होत असे. ढोल-ताशे, सनई, चौघडा, वाजंत्री आणि फटाक्यांच्या गजरात बैलजोड्यांची मिरवणूक काढली जाई. गावभर फिरून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे.
पोळ्यानंतर बैलजोडी घेऊन घरोघरी जाण्याचीही एक प्राचीन पद्धत होती. ‘बोजारा’ ही त्यातील महत्त्वाची प्रथा. वर्षभर बैलांचे संगोपन, चारापाणी आणि देखभाल करणाऱ्या गडी किंवा कुटुंबाला पोळ्याच्या दिवशी मानधन अथवा पैसे देण्याची पद्धत म्हणजे बोजारा.
घरी बैलजोडी आल्यानंतर घरातील महिला बैलांचे पाय धुऊन पूजा करतात, औक्षण करतात आणि पुरणपोळीचा गोड घास भरवतात. घरचे वैभव आणि शेतातील उत्पन्न हे बैलांच्या कष्टांमुळेच शक्य झाले, या भावनेतून ही पूजा केली जाते.
बैलपोळ्यापासून तान्हापोळ्यापर्यंत
ज्यांच्या घरी बैल नाहीत, अशा कुटुंबांत मातीचे बैल करून त्यांची पूजा करण्याची प्रथा काही ठिकाणी आजही आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा किंवा बाळपोळा साजरा केला जातो. मुलांच्या हातातील लाकडी किंवा मातीचे बैल सजवून मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी उत्कृष्ट सजावटीसाठी स्पर्धा घेऊन मुलांना बक्षिसेही दिली जातात. या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत ग्रामीण संस्कृतीचा वारसा पोहोचविला जातो.
बैल आणि शेतीचा ऐतिहासिक संबंध
मानवी जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाच्या शोधाला मोठे महत्त्व आहे. त्यानंतर बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे तंत्र विकसित झाले आणि कृषी संस्कृतीचा विस्तार झाला. शतकानुशतके बैलांच्या ताकदीवर शेतीची कामे होत आली आहेत.
पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठीही बैलांचा वापर केला जात असे. चामड्याच्या पखालीच्या साहाय्याने विहिरीतून पाणी उपसण्याचे काम बैलांच्या ताकदीने केले जाई. ही पद्धत तुलनेने पर्यावरणपूरक होती आणि भूजलाचा वापरही मर्यादित प्रमाणात होत असे. मात्र काळ बदलला. विंधन विहिरी, विद्युत पंप आणि आधुनिक यंत्रसामग्रीमुळे पाण्याचा उपसा वाढला आणि भूजलसाठ्यावरही त्याचा परिणाम झाला.
आज ट्रॅक्टरने शेतीतील बैलाची जागा मोठ्या प्रमाणावर घेतली आहे. यंत्रशक्तीचा विकास आवश्यक असला तरी शेतकऱ्याचा सखा असलेल्या बैलाचे योगदान विसरता येणार नाही. बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी, बैल, निसर्ग आणि श्रम यांच्यातील ऋणानुबंध जपणारा उत्सव आहे.
काळ बदलत आहे, शेतीचे स्वरूप बदलत आहे आणि बैलजोड्यांची संख्याही कमी होत आहे. भविष्यात बैलाला घरातील सदस्य मानण्याची परंपरा कमी होण्याची शक्यता असली, तरी बैलपोळ्याच्या माध्यमातून या कष्टकरी प्राण्याप्रती व्यक्त होणारी कृतज्ञता आणि ग्रामीण संस्कृतीची आठवण कायम राहणे आवश्यक आहे. कारण बैलपोळा हा केवळ शेतकऱ्याचा सण नाही; तो श्रमाचे महत्त्व, निसर्गाशी असलेले नाते आणि अन्नधान्य पिकविणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव आहे.
