श्रीरामपूर | प्रतिनिधी
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प’ या उपक्रमाअंतर्गत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने श्रीरामपूर एसटी आगार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे यांनी मार्गदर्शन करताना, “पावसाळ्यात वृक्षारोपण केल्यास झाडांचे नैसर्गिक संवर्धन होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी,” असे आवाहन केले.
या उपक्रमाद्वारे राज्यभर ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिल लोखंडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, श्रीरामपूर आगारप्रमुख अनिल बेहेरे, प्रवासी संघटनेचे किशोर फुणगे, कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, निर्मलाताई मस्के, राजश्री जाधव, शोभा काळे, आदर्श सरपंच बाळासाहेब ढोले तसेच जिल्हा संघटक अर्जुन राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


