
पाथरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे रेणाखळी येथे दि. २० जुलै रोजी आत्मा (ATMA) अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कापूस पिकातील सघन लागवड तंत्रज्ञान, दादा लाड लागवड पद्धत आणि गळफांदी काढण्याचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम प्रकल्प संचालक (आत्मा) दौलत चव्हाण, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) अभिषेक घोडके आणि तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल यांनी सघन लागवड व दादा लाड तंत्रज्ञानाची माहिती देत कापूस पिकातील गळफांदी काढण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांनी सांगितले की, कापूस पिकात योग्य लागवड पद्धती आणि पीक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादनासह दर्जेदार कापूस मिळू शकतो. कपाशीमध्ये गळफांदी आणि फळफांदी असे दोन प्रकारचे फांद्यांचे स्वरूप असते. गळफांदी तुलनेने अनुत्पादक तर फळफांदी उत्पादनक्षम असते.
त्यांनी सांगितले की, दादा लाड तंत्रज्ञानानुसार लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी गळफांदी काढली जाते, तर ६० ते ७० दिवसांनी किंवा झाडाची उंची सुमारे साडेतीन फूट झाल्यावर शेंडा खुडला जातो. त्यामुळे झाडातील अन्नद्रव्यांचा पुरवठा फळफांद्यांकडे अधिक प्रमाणात होऊन बोंडांची वाढ चांगली होते. परिणामी उत्पादनात वाढ होते तसेच बोंडसड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन कापसाची गुणवत्ता सुधारते.
तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांनी शेतकऱ्यांना सघन लागवड आणि दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करत कापूस उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका उपतंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश सिरस यांनी मानले. या शेतीशाळेला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

