पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रायगड जिल्हाधिकारी तसेच रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सावित्री नदीपात्रातील गाळ व वाळू उपसा कामामध्ये झालेल्या कथित अनियमितता, सार्वजनिक निधीचा वापर, अनधिकृत उत्खनन, अवैध वाहतूक, महसुलाचे संभाव्य नुकसान तसेच संपूर्ण कामाची प्रशासकीय, आर्थिक व तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी संताजी पवार (श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष), अश्विनी ताई ठाकूर (रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षा) आणि साईनाथ म्हात्रे (अलिबाग विधानसभा सरचिटणीस) हे प्रमुख उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाड शहराला भविष्यातील पूरस्थितीपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशाने सावित्री नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात पूरस्थितीबाबत नागरिकांमध्ये आजही तीच भीती कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत सर्वंकष चौकशी झालीच पाहिजे.
श्री. कांबळे पुढे म्हणाले की, सावित्री नदीपात्रातील गाळ काढल्यानंतर महाड शहराला पूर येणार नाही, असा निष्कर्ष कोणत्या तज्ज्ञ समितीने, कोणत्या वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे आणि कोणत्या तांत्रिक अहवालावर दिला, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर आणली पाहिजे. संबंधित समितीचा अहवाल, शिफारशी, तांत्रिक अभ्यास, मोजमाप, निविदा प्रक्रिया, आर्थिक खर्च, वाहतूक नोंदी, परवानग्या, लेखापरीक्षण आणि संपूर्ण प्रशासकीय कागदपत्रे सार्वजनिक करण्यात यावीत. तसेच, गाळ उपसा प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, नियमबाह्य उत्खनन, महसुलाचे नुकसान किंवा सार्वजनिक निधीचा गैरवापर झाला असल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे नष्ट होणार नाहीत यासाठी शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमधील महत्त्वाचे मुद्दे….
प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीहर्ष श्रीकांत कांबळे म्हणाले, “हा कोणत्याही व्यक्तीविरोधातील किंवा राजकीय हेतूने केलेला संघर्ष नाही. हा महाड शहराच्या भवितव्याचा, जनतेच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक पैशाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे. महाडने २००५ आणि २०२१ मधील महापुराचा भीषण अनुभव घेतला आहे. भविष्यात अशा आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने केलेल्या कामाची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे.”
“जनतेच्या करातून खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा प्रत्येक पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. गाळ उपसा कामाची सुरुवातीपासून आजपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एसआयटीमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.”
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारा पक्ष आहे. महाड शहराच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू.”
“जर आमच्या निवेदनातील मागण्यांवर तातडीने आणि समाधानकारक कार्यवाही झाली नाही, तर शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील.”
शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने प्रशासनाला आवाहन करण्यात आले की, या प्रकरणात तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि महाड शहराला भविष्यातील पूरस्थितीपासून कायमस्वरूपी संरक्षण देण्यासाठी शास्त्रशुद्ध व दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात.
निवेदन देणारे :
श्रीहर्ष श्रीकांत कांबळे
रायगड जिल्हा सचिव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
प्रमुख उपस्थित :
संताजी पवार – श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष
अश्विनी ताई ठाकूर – रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षा
साईनाथ म्हात्रे – अलिबाग विधानसभा सरचिटणीस
– प्रसिद्धी विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, रायगड जिल्हा.









