चिखलगाव, दि.(८): (आळंदी प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन व संरक्षण तसेच हरित चळवळीला गती देणे आणि पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराचे नैसर्गिक अध्यात्मिक , धार्मिक, आरोग्य विषयक सौंदर्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने दि.(७) जुलै , वार ( शुक्र) २०२६ रोजी, चिखलगाव येथे एका विशेष पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भीमाशंकर रोप– वे व रस्ताकृती समिती आणि शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चिखलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “बेल वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण ”कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. शिवभक्त कमलेश शारदा प्रसाद मिश्रा यांच्या विशेष सहकार्याने उपक्रमाचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चिखलगाव, खेड येथे झाले. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. उपक्रमाचे संयोजक किसनराव गोपाळे ,लक्ष्मणराव मुके, शोभाताई गोपाळे, बाळासाहेब गोपाळे, कैलासराव गोपाळे ,संजय साळुंखे,दत्ता देशमुख,दत्ता कुंभार, उल्हास मुके यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रमाचे नियोजन केले. या प्रसंगी दीपक बच्चे पाटील, ॲड.दत्तात्रय घोंगे, डॉ.किशोर घुमटकर, हरिष देखणे आदी मान्यवर उपस्थित होते.रोप–वे आणि रस्ताकृती समितीचा पुढाकार ही महत्वपूर्ण ठरला.
भीमाशंकर रोप–वे प्रकल्पाच्या आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच या भागातील पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश समितीच्या वतीने देण्यात आला .कार्यक्रम स्थळी उपस्थिताना बेल वृक्षांचे मानवी जीवनात असणारे अध्यात्मिक, धार्मिक, आरोग्य, पर्यावरण विषयक महत्व मार्गदर्शनातून सांगितले. भगवान शिव शंकरांना अत्यंत प्रिय असलेल्या पवित्र बेल वृक्षांची (बिल्वपत्र )लागवड करून भीमाशंकर परिसरातील अध्यात्मिक आणि पर्यावरणीय समतोल राखण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात उत्साहाने भाग घेतला तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि समितीच्या सदस्यांनी चिखलगाव परिसरात अनेक ठिकाणी“ बेल वृक्षांची“ रोपे लावून त्यांच्या जतन, संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी घेतली. “प्रतिवर्षी प्रत्येकी एक तरी वृक्ष लावू ,धरती मातेचे उत्तराई होऊ, प्रदूषणमुक्त विश्व करू “या संदेशासह उपस्थित विद्यार्थी ,नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यास संयोजकांनी आवाहन केले आहे. याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की,केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आश्रम शाळेच्या शिक्षकांनी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे चिखलगाव आणि भीमाशंकर परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणा विषयी एक नवी जाणीव– जागृती निर्माण झाली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. पर्यावरण संवर्धन आणि हरित चळवळीला प्रोत्साहन व गती देण्यासाठी या प्रेरणादायी उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.









